तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह एकूण 13 जणांचे निधन झाले. तर क्रॅशमध्ये एकमेव जिवंत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह सध्या लाइफ सपोर्टवर आहेत. या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सविस्तर माहिती सुद्धा दिली. आता याच घटनेवर शिवसेना खासदार संजय राउत यांनी शंका उपस्थित केली आहे.
संरक्षण मंत्र्यांनी संसदेत यावर माहिती दिल्यानंतरही शिवसेना खासदार संजय राउत समाधानी नाहीत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना रावत यांच्या निधनावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना राउत म्हणाले- Mi-17V5 रशियात बनवलेले अत्याधुनिक हेलिकॉप्टर होते. बिपीन रावत सुद्धा भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी काम करत होते. ते चीन आणि पाकिस्तानविरुद्धच्या कारवायांमध्ये सामिल होते. पुलवामा हल्ल्यानंतर लश्कर-ए-तोएबाच्या विरोधात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
अशात रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. "देशाचे सर्वोच्च सेनापती सर्वात आधुनिक आणि सुरक्षित अशा हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. आणि त्यांचा अपघातात मृत्यू होतो. याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत. काय घडले आणि कसे काय होऊ शकते? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकांच्या शंकांचे समाधान करावे. या घटनेची चौकशी व्हायला हवी. मला खात्री आहे की सरकार अजून या धक्क्यातून बाहेरही आलेले नसेल." असे राउत म्हणाले आहेत.
Post a Comment