सांगली/नाशिक : बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या अवकाळीने राज्य भरातील द्राक्ष बागांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. प्राथिमक अंदाजानुसार एकटय़ा सांगली जिल्ह्यात हे नुकसान तब्बल ३ हजार कोटींचे असून राज्यभरातील सातारा, सोलापूर, नाशिक येथील अंदाज घेता हे नुकसान ५ हजार कोटींच्या वर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा आडव्या झाल्या आहेत. वेलींवरची द्राक्षे फुटून खराब झाली आहेत. या अतिवृष्टीने बागांमध्ये सर्वत्र पाणी जमा झालेले असून या पाण्यामुळे वाचलेले पीकही विविध बुरशीजन्य आजाराला बळी पडणार आहे. पाऊस उघडल्यावर या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात होणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
दिवाळीपासून थंडीच्या हंगामात कधी ढगाळ तर, कधी हलका पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार पुरता हबकून गेला असतानाच मध्यरात्रीपासून सांगलीसह सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात अवकाळीने थैमान घातले. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी, पलूस, कडेगाव या तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, फलटण, वाई तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात द्राक्ष लागवड करण्यात आली आहे.
Post a Comment