दौंड रेल्वेस्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या निर्णयासाठी सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहे.
प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते, याबाबत वेळोवेळी सुप्रिया सुळे यांनी नकाशासहित लक्षात आणून दिले होते. इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित करून सरकारच्या लक्षात आणून दिले होते. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे त्यांनी सांगितले होते.
दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे हा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे. दौंड रेल्वेस्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी त्या सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक आता पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात आले आहे.
Post a Comment