0
युतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग 

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात िंचंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामानिमित्त मंत्रालयात आलेले लोकप्रतिनिधी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती कायम असताना, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेत असली, तरी गेल्या साडेचार वर्षांपासून दोन्ही पक्षांत कमालीचा तणाव आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात कुणाशीही युती करणार नसल्याची घोषणा केली होती आणि आताही ते ठाम आहेत. याउलट युतीसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते सकारात्मक आहेत. मात्र, शिवसेनेने अद्यापपर्यंत अंतिम निर्णय जाहीर केला नसल्याने दोन्ही पक्षांत चिंतेचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल, तर विधानसभेचेही जागावाटप आताच करून मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा शिवसेनेचा फॉर्म्युला असल्याची चर्चा आहे. मात्र, त्या संदर्भात हालचाल झाली नसल्याने युतीचा सस्पेन्स कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळे भाजपचे २२, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. त्यानंतर विधानसभेसाठी युती तुटल्यावर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काहीही नुकसान होणार नाही, असा शिवसेनेला विश्‍वास आहे.

भाजपच्या पराभवात रस
शिवसेनेला दिल्लीच्या सत्तेत रस नसल्याने युतीशिवाय लोकसभा निवडणुकीत आपले किती नुकसान होणार, यापेक्षा भाजपच्या पाडावात शिवसेना नेत्यांना रस असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने युती केली नाही, तरी ठाकरे शब्दावर ठाम असल्याच्या संकेतामुळे आणि स्वतःच्या ताकदीवर शिवसेनेचे दहा ते बारा खासदार निवडून येऊ शकतात, यात मुंबईतील तीन, ठाण्यातील दोन, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, जालना, औरंगाबाद, परभणी आणि शिरूर लोकसभा जिंकण्याचा विश्‍वास शिवसेना नेत्यांना आहे. याउलट भाजपची संख्या २२ वरून एक आकडी होण्याचा आनंद अनुभवता येईल, असे शिवसेने नेते उघडपणे सांगत आहेत.

Shivsena-Bjp

Post a Comment

 
Top