प्रशिक्षक उदय देशपांडे यांचा विदारक अनुभव
मुंबई- मल्लखांब ही पारंपरिक कला किंवा सध्याचा क्रीडाप्रकार. मूळचा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणाऱ्यांना या खेळाचे महत्त्व कधीच कळले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या खेळाला कधीच मदतीचा हात दिला नाही. उदय देशपांडे नामक एका व्यक्तीने मात्र आपलं आयुष्यच या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेचलं. तब्बल ५२ देशांमध्ये दोरीवरचा आणि खांबावरचा मल्लखांब घेऊन ते त्या देशांमध्ये गेले. कालपरवा ते मलेशियातील मल्लखांब प्रचार दौरा आटोपून आले. मुस्लिम देशांमध्ये या खेळाला कसे स्वीकारले? विशेषत: बुरख्यात वावरणाऱ्या महिलांना या देशांनी ‘ग्रीन सिग्नल’ कसा दिला याबाबत कुतूहल होते.
अमेरिकेपासून युरोप देश व आशिया खंडातील सिंगापूरपर्यंत मल्लखांब त्यांनी पोहोचवला. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन ते परत आले. त्यांच्या बोलण्यातून एक कटू सत्यही जाणवले. मल्लखांब हा खेळ बऱ्याच देशांनी स्वीकारला आहे, मात्र भारतीय संस्कृतीच्या मराठमोळ्या संस्कृतीच्या खाणाखुणा जोपासणाऱ्या या खेळावरची आपल्या संस्कृतीची छाप परदेशी लोकांना पुसून टाकायची आहे.
त्यांना सूर्यनमस्कारमध्ये सूर्याला नमस्कार न करताच पुढील प्रशिक्षण सुरू ठेवायचे. सूर्यदेवतेचा नामोच्चार त्यांना नको आहे. देशपांडे म्हणत होते, ‘जर्मनीत तर मी गेली २० वर्षे प्रशिक्षण देण्यासाठी जात आहे. त्यासाठी मी जर्मन भाषा शिकून घेतली. मात्र आता त्यांनाही मल्लखांबाची सुरुवात करताना एकसाथ नमस्ते म्हणायचे नाही. मल्लखांबावरच्या पकडी व आसनांची हिंदू देवदेवतांची नावे उच्चारायची नाहीत. कवायत विसर्जन म्हणायचे नाही. ‘जयहिंद’चा नारा द्यायचा नाही. आपली कला, कौशल्य, खेळ शिकून घेऊन त्यामध्ये त्यांना मोडतोड करायची आहे. आपण ज्युदो, कराटेत जपानी शब्द वापरताे, मात्र ते आपले शब्द वापरत नाही.

Post a Comment