कमाईची हमी, एकही गरीब उपाशी पोटी झोपणार नाही : काँग्रेस
जयपूर- आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर देशातील प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्नाची हमी देऊ, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. ही एक ऐतिहासिक घोषणा असल्याचे सांगून ते म्हणाले, आतापर्यंत जगातील कोणत्याच सरकारने लोकांना किमान कमाईची हमी दिलेली नाही. सर्वांच्या बँक खात्यात एक विशिष्ट रक्कम जमा केली जाईल. देशातील एकही गरीब रिकाम्यापोटी झोपणार नाही. रायपूर येथे आयोजित शेतकरी कृतज्ञता संमेलनात राहुल म्हणाले, मी जे बोलतो, ते करून दाखवतो. मग ती शेतकऱ्यांची कर्जमाफी असो की संपादित जमीन परत करण्याचे प्रकरण. काँग्रेसने मनरेगामध्ये १०० दिवसांचा रोजगार दिला. माहिती अधिकार दिला. आता आम्ही असे पाऊल टाकणार आहोत, जे जगातील कोणत्याच सरकारने आतापर्यंत टाकलेले नाही.
यासाठी प्रथमत: आपल्याला पक्षाची गरिबी हटवावी लागेल...
इंदूरमधील ९ गावांत ६ वर्षे चालली होती कमाई योजना, अल्पभूधारक मजुरी सोडून बनले शेतकरी
राहुल गांधी यांनी जशी घोषणा केली आहे, तशीच योजना इंदूर जिल्ह्यांतील ९ गावांत सर्वप्रथम राबवण्यात आली होती. अहमदाबादेतील एका संस्थेने २०१० ते २०१६ पर्यंत हा पथदर्शी प्रकल्प राबवला होता. निवडलेल्या कुटुंबातील प्रत्येकाला महिन्याकाठी एक ठरावीक रक्कम देण्यात आली. १९ वर्षांवरील व्यक्तीला २०० रुपये तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना १०० रुपये देण्यात आले. काही भागात प्रौढांना ३०० तर मुलांना १५० रुपये देण्यात आले. त्यानंतरच्या अभ्यासात आढळून आले की, पैसे मिळाल्यानंतर काही वृद्धांनी सुकामेवा खाल्ला. जे अल्प भूधारक होते, त्यांनी मोलमजुरी सोडली आणि ते शेतकरी झाले. बहुतेकांनी मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च केले. रोजगारात वाढ झाली. केंद्राच्या पथकाने याला आधार मानत ही योजना पुढे चालू ठेवण्याचा विचार केला होता.

Post a Comment