0
मुंबई : 

‘‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हे प्रकरण एका मोठ्या लोकनेत्याचा मृत्यू तसेच सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांशी संबंधित असल्याने याची ‘रॉ’ मार्फत चौकशी झाली पाहिजे.’’ अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांना इव्हीएम घोटाळ्याची कल्पना असल्यामुळेच त्यांची हत्या झाली असा आरोप लंडन येथील एका सायबर एक्स्पर्टने केला आहे. या आरोपनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्‍या ट्विटरुन ही मागणी केली आहे..

‘‘मुंडे साहेब यांचा मृत्यू हा अपघाती नाही, त्यात घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस होती. त्यामुळे सायबर तज्ञ सय्यद शुजा यांनी लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहे त्याने या शंकेला पुष्टी मिळाली.’’ असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणुक पूर्वीच फिक्स करण्यात आली होती असा दावाही सायबर तज्ञ सय्यद शुजा यांनी केला आहे. ईव्हीएम कसे हॅक करण्यात आले याचा पुरावाही आपल्याकडे असल्याची माहिती शुजा यांनी दिली. हॅकर्सने केलेल्या कथित दाव्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असल्याने ईव्हीएमवरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे. 


Post a Comment

 
Top