शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य यावे. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे अशा लोकांचं राज्य यावं. तेच सर्वांना समान न्याय देतील. छत्रपती शिवराय शाहू-फुले-आंबेडकरांचा जो विचारांच्या मार्गाने जाणारे लोक राज्यावर यावे, अशी आशा राज्याच्या जनतेच्यावतीने समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
नायगाव, ता. खंडाळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की ज्यांचे दिल्लीवर राज्य आहे त्यांच्याच राज्यात संविधान जाळण्यात आलं. मात्र एकालाही अटक करण्यात आली नाही. मात्र जालन्यामध्ये मनुस्मृती जाळली तेव्हा लगेच अटकसत्र सुरू केले. अशा विचारांचे लोक सध्या राज्य करीत आहेत. संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना देशात स्वातंत्र्य आहे. या राज्यात, देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत वाटते. सगळ्यांची मुस्कटदाबी केली जाते. इतकच नव्हे तर प्रसार माध्यमांची सुद्धा मुस्कटदाबी होत आहे. ही या देशाची खंत आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ मुस्कटदाबी सहन करत असेल तर राज्यातील सर्व सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींची कशा पद्धतीने मुस्कटदाबी होत असेल याचा विचार आता जनतेने करावा.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त नायगांव येथे आज, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव कार्यक्रम होणार आहे. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जलसंधारण व ओबीसी कल्याणमंत्री राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भूजबळ यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment