उस्मानाबाद ९६, परभणी ८०, जालना ५८, नगर ११६, जळगाव १०८, धुळे ११६, सातारा १११, बुलडाणा २४६ गावे
मुंबई- राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून राज्यात मराठवाड्यात तीन जिल्ह्यांतील २३४ गावांसह आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आणि कमी पर्जन्यमान झालेल्या एकूण ५० महसूल मंडळातील ही गावे असून या सर्व गावांत तातडीने दुष्काळ निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मंडळांना केंद्राच्या निकषानुसार मदत देता येऊ शकत नसल्याने उपाययोजनांचा खर्च राज्याच्या तिजोरीतूनच करावा लागणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील दुष्काळ निवारणासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे निकष वापरून जाहीर केला दुष्काळ
केंद्राच्या दुष्काळी संहितेनुसार ३१ ऑक्टोबरला राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. यापैकी ११२ तालुक्यात गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळी स्थिती आहे. यासाठी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्याने केंद्र सरकारला पाठवला आहे.
काही तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक होती, मात्र केंद्राच्या संहितेतील निकषांची पूर्तता होत नसल्याने त्यांचा यादीत समावेश नव्हता. तरीही निकष निश्चित करून राज्य सरकारने एकूण २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला.
नव्या घोषणेचा भार राज्याच्या तिजोरीवरच
ज्या मंडळांमध्ये ७०० मिलिमीटरपेक्षा कमी व सरासरी पेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला अशा मंडळांचा यात समावेश होता. पण त्यानंतरही विविध भागांत टंचाईची स्थिती बिकट असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय सर्वस्वी राज्याच्या निकषांवर घेण्यात आल्याने हा सर्व खर्च राज्य सरकारला आपल्या तिजोरीतूनच करावा लागणार आहे.
पाेकळ घोषणा नकोत...
सरकारने पोकळ घोषण न करता शेतकऱ्यांना थेट नुकसानभरपाई द्यावी. पीक विम्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. ते त्वरित मिळावेत. उच्च शिक्षणासाठी फीमाफी द्यावी. कर्जवसुली थांबवल्याचे सांगितले जाते, परंतु ती अजूनही जोरात सुरू आहे. रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नव्याने दुष्काळ जाहीर झालेली मंडळनिहाय गावे
परभणी जिल्हा : ता. गंगाखेड (२०), जिंतूर सांगवी (३०), बामणी (३०).
जालना जिल्हा : ता. मंठा (२८), ढाेकसाळ (३०).
उस्मानाबाद जिल्हा : ता. उमरगा (१७), मुरुम (१७), नारंगवाडी (१९). मुळज (२२), दाळिंब (२१).
सातारा जिल्हा : निमसाेड (१०), मायणी (२५), पुसेगाव (१०), बुध (१६) खटाव (१२), अाैंध (१४), पुसेसावळी (११), कातरखटाव (१३).
नगर : अकाेले (२०), समशेरपूर (२५), काेतुळ (२९) ब्राह्मणवाडा (२४).
शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण, कर्जवसुलीस स्थगिती
-नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना.
-शेतकरी कर्जाचे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया सुरू.
-कर्जवसुलीलाही स्थगिती, बंद पाणीपुरवठा योजनांची थकीत वीज बिले भरणार.
-रोजगार हमी योजनेमध्ये १५० दिवस मजुरी देण्यास केंद्राची मंजुरी. मजुरीचा कालावधी आता ३५० दिवस करणार.

Post a Comment