औरंगाबाद- बीड बायपासवर एका विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळी फोटोसेशनमध्ये मग्न असताना वधूच्या आईच्या पर्समधून सोन्याचे दागिने,आहेरात अालेल्या पैशांसह दीड लाखापेक्षा अधिक रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी घडला. फोटोसेशन सुरू असताना वधूच्या आईची बॅग चोरट्यांनी पळवली. यामध्ये १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज होता.
लग्नसमारंभामध्ये वर अथवा वधूच्या जवळच्या नातेवाइकांच्या दागिने, पैशांच्या बॅगा पळवण्याचा हा आठवडाभरातील तिसरा प्रकार अाहे. तर लग्नसराईचा हंगाम असल्याने अशा प्रकारच्या चोरीची गेल्या ३० दिवसांतील ही सातवी घटना आहे. यामुळे विवाह सोहळ्यातील गर्दीचा फायदा उचलून चोरी करणारी एखादी टोळीच सक्रिय असल्याचा संशय आहे.
रविवार, २३ डिसेंबर रोजी शहरातील व्यावसायिक कैलास गंगाराम चाटसे (५०) यांच्या मुलीचा बीड बायपासवरील रिगल लॉन्सवर लग्न समारंभ होता. लग्न लागल्यानंंतर वर-वधूंचे मित्रमैत्रिणी, आप्तस्वकीय,नातेवाईक मंडळींसोबत छायाचित्र काढणेे सुरू होते. त्या वेळी वधूच्या आईने आपली पर्स बाजूला ठेवली होती. ५० हजार रुपये रोख, ३० हजार रुपयांची सोनसाखळी तसेच आहेरात आलेली ८४ हजार ७०० रुपयांची रक्कम पर्समध्ये होती. वर-वधू ,वधूची आई, मित्रमैत्रिणी आप्तस्वकीयांसोबत छायाचित्र काढण्यात मग्न असताना चोरट्यांनी डाव साधला. वधूच्या आईची पर्स सफाईने चोरून नेली. चोरट्यांनी एकूण १ लाख ६४ हजार ७०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात दोन दिवसांनंतर म्हणजे २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक निरीक्षक मनोज बहुरे पुढील तपास करीत आहेत.
बीड बायपासवर चोऱ्या वाढल्याबीड बायपासवरील मंगल कार्यालय, धार्मिक कार्यक्रमांमधून चोऱ्यांचे प्रमाण गेल्या महिनाभरात वाढले अाहे. ३ डिसेंबर रोजी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि माजी नगरसेेवक राजेंद्रसिंग जबिंदा यांच्या मुलीच्या लग्नातूनही वधूचेे तब्बल २९ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. महिना होत अाला तरीही अद्याप या चोरीचा तपास लागलेला नाही.

Post a Comment