0
आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार लासलगावात; जुन्या कांद्याला १००-३०० रु. क्विंटलचा भाव

  • 1 kg of onion production costs Rs 8.50, farmers get 1 rupeeनवी दिल्ली- सरकार शेतकऱ्यांना १५०% किमान हमी भाव (एमएसपी) देण्याचा दावा करत असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाच्या १५ टक्के दर मिळणेही अवघड झाले आहे. सरकारी अंदाजानुसार एक किलो कांदा उत्पादनावर ८.५० रुपये खर्च होतात. नाशिकच्या लासलगावमधील कांदा बाजारात जुन्या कांद्याला १००-३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे, तर नव्या कांद्याला ८००-१,००० रु. पर्यंत दर अाहे. मात्र, अनेक ठिकाणी १ ते १.५० रुपये प्रति किलोच्या दराने कांदा विक्री करावा लागतो.

    काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी कांद्याला दर मिळत नसल्याने आत्महत्या केली होती. नाशिकच्या संजय साठे यांनी ७५० किलाे कांदा विक्रीतून मिळालेले १,०६४ रुपये विरोध म्हणून पंतप्रधानांना पाठवले होते. मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका शेतकऱ्याला तर २,१०० किलो कांदा विक्रीतून केवळ २,३०० रुपये मिळाले होते. म्हणजेच १.०९ रुपये किलो. ही समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्या विविध समस्या मांडल्या. या दोन्ही राज्यांत देशातील सर्वाधिक कांदा उत्पादित होतो.
    १ महिन्यात किरकोळ दरात ५ रु. घट 
    शेतकऱ्यांच्या कांद्याला एक रुपये भाव मिळत असला तरी ग्राहकांना दिलासा नाही. ग्राहक मंत्रालयानुसार दिल्लीत किरकोळ कांद्याला २५ ते २७ रुपये, नाशिकमध्ये १५ रुपये आणि मध्य प्रदेशच्या शहरात १५ ते ३० रुपये दर आहे. डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून हेच दर आहेत. एक नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये ३१ रुपये दर, तर नाशिकमध्ये २४ रुपये दर होता. एमपीमध्ये १५ ते ३० रुपये भाव होता.
    २०१७-१८ मध्ये निर्यात ३५% घटली 
    लासलगाव एपीएमसीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यासाठी कांदा निर्यातीचे बदलत जाणारे धोरण जबाबदार असल्याचे मानतात. ते म्हणाले, काही वर्षांत धोरण अनेकदा बदलले, त्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अापली विश्वसनीयता संपली. तेथे पाकिस्तानी कांद्याला जास्त मागणी आहे. २०१६-१७ मध्ये भारताने २४.१६ लाख टन कांदा निर्यात केला होता. २०१७-१८ मध्ये १५.८९ लाख टन निर्यात झाली. यावर्षी ८.३१ लाख टन निर्यात झाली आहे.
    ४ एकरमध्ये ६०० क्विंटल कांदा उत्पादन, विक्रीत ९ हजार रु. तोटा
    नाशिकच्या मोहगावमधील शेतकरी संपत यांनी ४ एकरमध्ये कांदा लावला. प्रति एकर ५२,००० रु. खर्च आला. उत्पादन ६०० क्विंटल झाले. तीन-चार महिने ठेवण्यामुळे १५० क्विंटल कांदा खराब झाला. पहिले २५० क्विंटल कांदा मंडईत घेऊन गेले. ४०० रु. च्या दराने एक लाख रुपये मिळाले. त्यानंतर १०० क्विंटल कांद्याला ४८०रु. दराने ४८,००० रुपये मिळाले. ५० क्विंटल कांदा ५०० रु. च्या भावाने २५,००० मिळाले. उर्वरित ५० क्विंटल कांद्याला ५२० रुपयांच्या दराने २६,००० रु. मिळाले. असे ४ एकरमध्ये २.०८ लाख रु. खर्च झाले, तर मिळाले केवळ १.९९ लाख रुपये.
    व्यापाऱ्यांनी कांदा घेतला नाही त्यामुळे मईडीत फेकावा लागला 
    मोह येथील शेतकरी शांताराम भिसे यांनी सांगितले की, त्यांनी खरिपात उशिरा कांद्याची लागवड केली होती. उत्पादन आल्यानंतर कांद्याचे दर १५०० ते १७०० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर कांदा मंडईत घेऊन गेले. मात्र, त्याच दिवशी दर ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. चांगल्या ग्रेडच्या कांद्याला केवळ ६०० ते ७०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. छोटा गोल कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, आम्ही तुम्हाला ५०० रुपये देऊ, नसता कांदा कोठेही टाकून द्या. नाइलाजाने मला कांदा फेकून द्यावा लागला.
    गुणवत्ता थोडीही खराब झाली तर खर्चाच्या अर्धाही दर मिळत नाही 
    म ध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात गाव लबरावदाचे शेतकरी नरेंदसिंह राठोड यांनी सांगितले की, त्यांना एक एकर कांदा उत्पादनावर सुमारे ५७ हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, त्यानुसार दर मिळाला नाही. एकूण खर्च आणि मेहनतच निघत आहे. लाभ मिळेल असा दरच मिळत नाही. कधी कधी तर खर्च मिळणेही अवघड होते. उन्हामुळे कांदा लागवड आणि काढण्यासही त्रास सहन करावा लागतो. हवामानाच्या माऱ्यामुळे पीक खराब झाल्यास दरात घसरण होते. तेव्हा खर्चाच्या अर्धाही दर मिळत नाही.

Post a Comment

 
Top