जालना- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना टीका करण्याशिवाय दुसरे येतेच काय? त्यांच्या जनसंघर्ष यात्रेकडे कुणी फिरकलेच नसल्याने त्याला काहीच प्रतिसाद नव्हता. त्यामुळे चव्हाण यांना काय टीका करायची आहे ती करू द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची खिल्ली उडवली. फडणवीस यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा व कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळासाठीच्या सर्व उपाययोजना सुरू झाल्या असून निधी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर,राज्यमंत्री अर्जुन खोतकर,माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, आमदार संतोष दानवे, नारायण कुचे आदींची उपस्थिती होती.
लोडशेडिंग बंद होणार : ३५ टक्क्यांपेक्षा कमी वीज बिल वसुलीच्या ठिकाणी लोडशेडिंगचे निर्देश एमईआरसीने दिले होते. मात्र दुष्काळामुळे सूट द्यावी, अशी विनंती केली आहे. सध्या सुरू असलेले लोडशेडिंग काही दिवसांतच बंद होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सीएम चषकाला सरकारी पैसा नाही : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सीएम चषकातील स्पर्धेला विरोध होतो आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सीएम चषकाला सरकारचा पैसा नाही. शिवाय हा सरकारचा कार्यक्रम नाही. हा खेळाचा विषय आहे त्यामुळे याला कुणी विरोध करू नये.मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळवून देणारच : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाट्याचे व हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळेलच. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच वरच्या धरणांतून पाणी सोडले जात आहे. आम्हाला खालचे आणि वरचे असा भेदभाव करायचा नाही. पाणी सोडताना नगर-नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरूच : सिंचन घोटाळ्याची चौकशी बारगळली नाही. यात १०० वर प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झालेत. ७ प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी झाली आहे. या संपूर्ण प्रकाराची नीटपणे चौकशी सुरू आहे. त्यावर न्यायालयाचेही लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment