महिलांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने स्वराज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फराळ व मेहंदी स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या.
स्वराज फाऊंडेशन आयोजित फराळ व मेहंदी स्पर्धा व कार्यक्रमासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्या सुविद्य पत्नी रुपाली पाटील, बिग एफएम फेम आरजे. बंडय़ा, स्वराज फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर, दिंगबर आगवणे, नगरसेविका रश्मी नाईक- निंबाळकर, मदलसा कुंभार, ज्योती खरात, मीना नेवसे, नंदिनी सावंत, विनीता कदम, आमित रणवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्वराज फाऊंडेशनच्या अध्यक्षा जिजामाला नाईक-निंबाळकर म्हणाल्या की, मागील वर्षीच्या फराळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून यंदाही हा कार्यक्रम व्हावा, अशी महिलांची मागणी होती. या वर्षी मेहंदी स्पर्धाही घेण्यात आली व तीला महिलांनीही उदंड प्रतिसाद दिला. यात ग्रामीण भागातील महिलांनी घेतलेला सहभाग ही आपल्यासाठी विशेष आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. फराळाच्या पदार्थातून केलेली सजावट, आकर्षक मांडणी, चव यासह दिलेला सामाजिक संदेश हा वेगळा अनुभव आहे. हे पाहिल्यावर या महिला माझ्यासाठी स्वयंपाक घरातील इंजिनीअर असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मेहंदी स्पर्धा उत्कंठावर्धक ठरल्या 1 तासात अत्यंत सुबक व सुंदर मेहंदी काढून युवतींनी आपले कौशल्य दाखविल्याचे त्यांनी कौतुक केले. यापुढे ही असेच महिलांसाठी विविध कार्यक्रमातून त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी स्वराज फाऊंडेशन काम करेल, असा विश्वास ही त्यांनी याप्रसंगी दिला.
युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही या कार्यक्रमास सदिच्छा भेट देत फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला. या कार्यक्रमात फराळ स्पर्धेत सुनीता साबळे प्रथम, द्वितीय सूवर्णा रणवरे, तर तृतीय क्रमांक कांचनमाला शिंदे यांनी पटकावला. तसेच उत्तेजनार्थ म्हणून सुलभा मोहोटकर, रूपाली कचरे, नंदा बोराटे या विजेत्या ठरल्या. विजेत्यांना साडी, ट्रॉफी, स्वराज गिफ्ट हँपर असे पारितोषिक देण्यात आले. विशेष म्हणजे यात लहान मुलांच्या आवडीच्या पदार्थांसाठी अश्विनी कदम या विजेत्या ठरल्या, त्यांना पर्लसेट ट्रॉफी व स्वराज गिफ्ट देण्यात आले.
तसेच मेहंदी स्पर्धेत ऐश्वर्या यादव प्रथम, द्वितीय गायत्री पोतदार, तर तृतीय क्रमांक सिया शहा यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षिस रेश्मा ननवरे, मोना भट्टड, मिनाज खान यांना देण्यात आले. सर्व विजेत्यांना पर्ल सेट ट्रॉफी व स्वराज गिफ्ट हँपर देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धेकांना ‘स्वराज’तर्फे तूप गिफ्ट म्हणून देण्यात आले. यावेळी स्वीटी शहा, अर्चना कांबळे, सुमन नागटीळे, विजया जाधव, मनीषा काळे, वैशाली खराडे, वैशाली सस्ते आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून अनिता जोशी, उज्ज्वला शिंदे, दिपीका व्होरा, ज्योती रासकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी, तर युवराज पवार यांनी आभार मानले.

Post a Comment