औरंगाबाद- राफल विमानाची नेमकी किंमत किती, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी 670 कोटी रुपये असे लेखी उत्तर दिले. मग मोदी तेच विमान 1670 कोटींच्या दराने खरेदी करतात. हे कसे काय होऊ शकते. हा किक बॅकचा प्रकार आहे. म्हणजे पैसे परत आपल्याच खिशात आणण्यात आल्याचे दिसते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चौकशी झाली तर सगळेच तुरुंगात जातील, असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या.
चव्हाण म्हणाले, मी 2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असताना राफेल विमान खरेदी व्यवहाराची आपल्याला माहिती होती. खरेदी युरोत असल्याने त्याची किमत त्या काळात 550 ते 660 कोटींच्या आसपास होती. रुपयाचे अवमूल्यानामुळे त्यात काहीसा बदल अपेक्षित होता. परंतु ती थेट तिप्पट वाढणे शक्यच नव्हते. शस्त्र खरेदीचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी पंतप्रधानांसह पाच प्रमुख मंत्र्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची मान्यताही घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात अनिल अंबानी यांनी विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती करण्याची एक कंपनी स्थापन केली आणि एप्रिलमध्ये मोदींनी संरक्षणमंत्री किंवा अन्य कोणालाही विश्वासात न घेता राफेल खरेदीचा करार केला. मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाण्याच्या एक दिवस आधी परराष्ट्र खात्यातील सचिवाने म्हटले होते की, असे व्यवहार पंतप्रधान करत नाहीत. तरीही परराष्ट्र, संरक्षण मंत्री नसताना मोदींनी व्यवहार केला.
भाजप 180 पर्यंतच थांबेल
आगामी लोकसभेत भाजपला बहुमत मिळणार नाहीच. त्यांच्या जागा 160-180 पर्यंतच थांबतील, असा दावा चव्हाण यांनी केला. ज्या हिंदी भाषिक राज्यात (काऊ बेल्ट) भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना 89 टक्के जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग आणि माया एकत्र आले तर नक्कीच भाजपला मोठा फटका बसेल. बिहारमध्ये नितीशकुमारविषयी नाराजी तर लालूविषयी सहानुभूती आहे. याचा अंदाज मोदींना आहे. त्यामुळे पैशाचा वापर होईल. महागठबंधन होणार नाही, यासाठी आमिषे दाखवले जातील, तुरुंगात घालण्याची भीती दाखवली जाईल. धार्मिक ध्रुवीकरण केले जाईल. धार्मिक स्थळे तसेच व्यक्तींवर खोटे का होईना हल्ले होतील, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली.-
पवार पंतप्रधान होऊ शकतात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात का? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ती त्यांची महत्वाकांक्षा आहे. ते कमालीचे हार्ड वर्कर आहेत. त्यांचे नेटवर्कही तगडे आहे. पंतप्रधान होण्यासाठीच त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. आता महागठबंधन यशस्वी होऊन त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर ते समन्वयकाची भूमिका बजावू शकतात. आणि समन्वयक म्हणजे जवळपास पंतप्रधानच असतो.
राणे- व्हिजिनरी लिडरशीप नव्हती
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयी चव्हाण म्हणाले, काँग्रेसमध्ये येताना कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदाचे (श्रेष्ठींतर्फे नव्हे) आश्वासन दिले असावे. त्यामुळे अशोक चव्हाण व नंतर मी मुख्यमंत्री झाल्याने ते नाराज होऊन बाहेर पडले. अर्थात राणे ही काही व्हिजिनरी लिडरशीप नव्हती. तरीही आम्ही त्यांना कमालीचा सन्मान दिला. आता त्यांनीच त्यांच्या निर्णयाचे मुल्यमापन करावे.
पुढील स्लाइडवर वाचा.. होय, आम्ही जास्त हिंदुत्वाकडे वळतोय -
होय, आम्ही जास्त हिंदुत्वाकडे वळतोय
काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष या प्रतिमेवर शहाबानो प्रकरणाने शिक्काच बसला होता. इंदिरा गांधी ‘बॅलन्स’ साधत होत्या. नंतर ते शक्य झाले नाही. आता ती प्रतिमा पुसण्याचा प्रयत्नात जरा जास्त हिंदुत्वाकडे वळल्याचे दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले.
आंबेडकरांसाठी अजूनही तयारी
एमआयएम आणि अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेसला बसणार हे चव्हाण यांनी मान्य केले. ओवेसी स्वत:ला दुसरा जिना असे प्रोजेक्ट करतात. प्रभावी, घटनेच्या चौकटीत बोलतात. म्हणून तरूण मुस्लिम एमआयएमसोबत आहेत. पण त्यांच्या पक्षाची विचारसरणीच वेगळी असल्याने त्यांच्याशी बोलणी होऊच शकत नाहीत. मात्र, अॅड. आंबेडकरांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु सभेला झालेली गर्दी पाहून ते भरकटले आहेत. आताही आम्ही त्यांना अकोला किंवा मुंबईतील ते म्हणतील ती जागा देण्यास तयार आहोत. पण १२ जागा मिळणार नाही. एकच जागा मिळेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइडवर वाचा... विलासरावांइतकी माझी पकड नव्हती -
पक्षाने मला खुप दिले
तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा स्पर्धेत आहात का? या थेट प्रश्नावर चव्हाण म्हणाले, मी अजिबात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नाही. पण घरी बसलो तर ती पक्षाशी प्रतारणा होईल म्हणून प्रचार करतोय. मोदी भारतीय संस्कृतीला घातक आहेत. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माझा हातभार लागावा ही इच्छा असल्याचे ते म्हणाले.
विलासरावांइतकी माझी पकड नव्हती
बोलण्याच्या ओघात चव्हाण म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांची प्रशासनावर तसेच सहकाऱ्यांवर मजबूत पकड होती. तेव्हा तुमचीही पकड मजबूत आहे, असा प्रश्न केला तेव्हा नाही, त्यांच्याएवढी माझी पकड नव्हती. त्यातच सहकारी मंत्री मला ‘हा बाहेरून आला’ असे म्हणायचे. काही मंत्र्यांच गट तट होते. माझा गट नव्हता. मात्र, मला आत्मविश्वास होता शिवाय सोनिया गांधींचा पाठिंबा होता. त्यामुळे मी लवकर समरस झालो.
पुढील स्लाइडवर वाचा... 26-22 चा फॉर्म्युला कायम राहील - दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नाही
आता दिल्लीत जाणार असा प्रश्न केला असता, मला दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मी तेथून लढू शकत नाही आणि पुणे तसेच अन्य ठिकाणाहून मी लढावे अशी मागणी होत असली तरी मी दुसऱ्याच्या मतदारसंघात घुसखोरी करून निवडणूक लढवणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
26-22 चा फॉर्म्युला कायम राहील
राष्ट्रवादीसोबत लोकसभेला 26-22 चा फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मागील विधानसभेला 127 जागांवर राष्ट्रवादी पुढे असल्याचा दावा केला जातो असे असेल तर आम्हीही 161 जागांवर पुढे होतो. म्हणजे राष्ट्रवादी आठव्या क्रमांकावर असेल तर आम्ही सातव्या क्रमांकावर होतो, असे ते मिश्किलपणे म्हणाले. तेव्हा लाट होती. त्यामुळे सर्वच पक्षांची वाताहात झाली. त्यामुळे या दाव्यांना काहीही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. जुना फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. अर्थात या समितीत आपण नसल्याचेही स्पष्ट केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment