0
  • Ahead of the alliance's seat on May 14 in Mumbaiनगर - महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या घडामोडींना गती आली आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी मुंबईत १४ नोव्हेंबरला बैठक होत आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपतील युतीची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.


    महापालिकेच्या शहरातील १७ प्रभागांत ६८ नगरसेवक निवडून देण्यासाठी ९ डिसेंबरला नगरकर कौल देणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट आदी पक्ष आपले उमेदवार िरंगणात उतरवणार आहेत. प्रभाग मोठे झाल्याने इच्छुकांचीही संख्या कमालीची वाढली आहे. त्यातच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरू असलेली स्पर्धा चुरस वाढवत आहे. काही नवोदित इच्छुकांनी दोन्ही थडीवर हात ठेवत मिळेल त्या पक्षाचे लेबल लावून रिंगणात उतरण्याचा चंग बांधला आहे. उमेदवारी डावलली, तर प्रसंगी अपक्ष लढणाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे.

    प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर मंगळवारी (६ नोव्हेंबर) अंतिम मतदारयादी जाहीर झाली. त्यानुसार २ लाख ५६ हजार ७०५ मतदार असून सुधारित यादीत प्रारूप यादीच्या तुलनेत मोठे फेरबदल करण्यात आल्याचे दिसून आले. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी होणार आहे, पण जागावाटप कसे असावे याबाबत अजून एकमत झालेले नाही. १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल होणार आहेत.
    त्यामुळे आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेला गती येणार आहे. १४ नोव्हेंबरला मुंबईत दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी जागावाटपाच्या मुद्द्यावर एकत्र बसणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी अर्ज दाखल करावे, असेही पक्षाचे निरीक्षक श्यामराव उमाळकर यांनी सांगितले अाहे.
    आघाडीचा विषय मार्गी लागल्यात जमा असला, तरी जागावाटपाचे सोपस्कर बाकी आहेत. दुसरीकडे भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्याची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपमधील इच्छुकांनी पॅनेल बांधणीसह स्वतंत्रपणे प्रचाराला गती दिली आहे. प्रदेशपातळीवरून अजूनही युतीबाबत ठोस निर्णय देण्यात आला नसल्याने युती होणार की नाही याबाबत काही अंशी संभ्रमाचे वातावरण आहे.

    सेना-भाजप युतीची आशा का झाली धूसर ?
    महापालिकेत भाजप व शिवसेना सत्तेत असतानाही दोन्ही पक्षांत धुसफूस सुरूच आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला. दरम्यान, युती होईल किंवा नाही याबाबत संभ्रम कायम असतानाच आता निवडणुकीचेही बिगुल वाजले. सर्व प्रभागांत या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ऐनवेळी युतीचा निर्णय घेतल्यास ते बंडखोरीला आमंत्रण ठरू शकते. याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. त्यामुळे युती होण्याची आशाच धूसर झाली आहे.

Post a Comment

 
Top