यावल- किनगाव येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन मित्रांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जितेश कोळी व महेश कोळी अशी मृतांची नावे आहे. दोघे बालपणीचे मित्र होते.
मिळालेली माहिती अशी की, किनगाव खुर्द गावातील काही तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाबाहेरील एका हॉटेलमध्ये गेले होते. सोमवारी रात्री साडे दहा वाजता जितेश ओंकार कोळी (वय-23) व महेश दिलीप कोळी (वय-24) हे दोघे दुचाकीवरून (एमएच.19-सीबी.3597) घराकडे परत येत होते. गावाजवळील चौफुलीवर यावलकडून भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार दोघे रस्त्यावर कोसळले. अपघातात जितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर महेश कोळीचा जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महेशचीही प्राणज्योत मालवली. किनगाव येथे दोन्ही मित्रांवर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रस्त्यावर ट्रक उभा करून चालक फरार..
दोन मित्रांना धडक देऊन चोपडाकडे निघालेला ट्रक (जीजे 06 एएक्स 0799) मंगरूळ फाट्याजवळ लावून चालक पसार झाला. अडावद पोलिसांच्या मदतीने यावल पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेतला आहे. पत्रकार शेखर पटेल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Post a Comment