- मुंबई- भारताप्रमाणे फिरकीला पोषक खेळपट्टी असूनही चौथी कसोटी आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ निराश झाला आहे. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने दगा दिल्यामुळे रागावलाही आहे. त्याचा परिणाम म्हणून ओव्हलवर येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या क्रिकेट कसोटीत अश्विनला डच्चू देण्याचे टीम इंडियाने ठरविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अश्विनप्रमाणे दगा देणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्यावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. अश्विनच्या जागी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला तर हार्दिक पंड्याला पर्याय म्हणून नवोदित खेळाडू हनुमा विहारी याच्याकडे पाहिले जात आहे.
मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला अँडरसन-ब्रॉड-वोक्स या इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर उभे करू नये असे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. पृथ्वी शॉच्या तंत्रात सलामीच्या फलंदाजासाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी अजून नाहीत. नेमका याचा लाभ इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्यास पृथ्वी शॉ आत्मविश्वास गमावून बसण्याचा धोका आहे. त्यामुळे ओव्हल कसोटीत त्याला संधी देण्याऐवजी भारतात विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत आजमावून पाहावे, असे मत पडले. त्यामुळे अश्विन व पंड्या यांच्या जागी अनुक्रमे जडेजा व हनुमा विहारी खेळणार हे जवळजवळ निश्चित झाल्यासारखे वाटते.
मोईन अलीसारखा ऑफ स्पिनर भारताची दाणादाण उडवत असताना, अश्विनने निराशा केल्यामुळे संघ व्यवस्थापन नाराज असल्याचे कळते. अश्विनला त्याचा फिटनेसबाबतही विचारण्यात आले होते. त्या वेळी त्याने संघाला जेव्हा जेव्हा गोलंदाजी टाकण्यासाठी आपली आवश्यकता असेल तेव्हा आपण गोलंदाजी करू, असे आश्वासन अश्विनने दिल्याचे वृत्त आहे. मात्र अश्विन पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याचे चेंडू नेहमीप्रमाणे फिरत नव्हते. त्याचाच फायदा इंग्लंडने उचलला. केवळ अश्विनच्या अपयशामुळे भारताने मालिका गमावली, असा मतप्रवाह आढळतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment