नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस विरोधात बाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वक्तव्याचा दाखला देत सतत वाढणाऱ्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) साठी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत हल्ला चढवला आहे. काँग्रेसची चुकीची धोरणे हेच यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे इराणी म्हणाल्या.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले होते की, सततच्या वाढणार्या एनपीएसाठी युपीएच्या काळातील घोटाळा आणि प्रशासनातील इतर अडचणी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. एनडीए सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याचे कारणही महत्त्वाचे असल्याचे राजन म्हणाले.
राजन यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत स्मृती इराणी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. स्मृती इराणी म्हणाल्या की, राजन यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. एनपीएच्या वाढत्या संख्येसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे या वक्तव्यावरून स्पष्ट होते, असेही इराणींनी म्हटले. तसेच राहुल गांधी, प्रियंका वढेरा आणि सोनिया गांधींवरही त्यांनी हल्ला चढवला. करदात्यांचा पैसा या सर्वांनी लुटल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.

Post a Comment