राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांत पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे.
औरंगाबाद - राज्यात २०१४ च्या दुष्काळानंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. सप्टेंबरमधील पावसावर भिस्त असणाऱ्या मराठवाड्यावर कोरड्या सप्टेंबरमुळे दुष्काळाचे सावट आहे.मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर ७ जिल्ह्यांत पावसाची तूट लक्षणीय वाढली आहे. राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांत पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मान्सून देशातून परतण्यास २९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम राजस्थानात मंगळवारपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील आर्द्रता कमी होऊन जमिनीलगत वारे वाहण्यास अनुकूल स्थिती होत आहे. ही सर्व मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनच्या परतीला विलंब झाला असून, मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.पीक उत्पादनात ५०% घट शक्यसप्टेंबरमधील पावसाच्या दडीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, मक्यासह प्रमुख पिकांच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. जमिनीच्या पोतानुसार उत्पादन कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. आता सर्व आशा परतीच्या पावसावर आहेत.
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद
Post a Comment