
नवी दिल्ली - पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याशिवाय त्याला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन वन डेतही बाकावरच बसवण्यात आले होते. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. त्याच्या समावेशानंतरही भारताला पराभव पत्करावा लागला. पूर्णपणे तंदुरूस्त नसलेल्या भुवनेश्वरला खेळवण्याच्या निर्णयावरून संघ व्यवस्थापनाला रोषाचा सामना करावा लागत आहे.
भुवनेश्वरला तिस-या वन डेत खेळण्याची परवानगी देणारे भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रीक फॅरहार्ट आणि ट्रेनर शंकर बासू यांच्यावर टीका होत आहे. फिट नसल्यामुळे भुवनेश्वरला कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघातून वगळण्यात आले आहे आणि अशात त्याला वन डेत का खेळवले हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिका-याला विचारले असता तो म्हणाला, हा प्रश्न तुम्ही आम्हाला नाही, तर रवी शास्त्री यांना विचारा. ज्यावेळी आम्ही सांगतो की भुवनेश्वर दुखापतीतून सावरत आहे, त्यावेळी त्याचा अर्थ तो पूर्णपणे फिट नाही असाच होतो. कसोटी मालिकेसाठी तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असताना तिस-या वन डेत त्याला खेळवण्याची जोखीम घ्यायची कशाला ?
फॅरहार्ट आणि बासू हे भुवीच्या दुखापतीबाबत अपडेट देत होते आणि त्याला लवकर खेळवल्यास ही दुखापत वाढू शकते, असे सांगण्यात आले होते का, या प्रश्नावर बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, आयपीएलमधील 17 पैकी 5 सामन्यांत भुवनेश्वर खेळला नव्हता. बीसीसीआयने आयपीएल फ्रँचाईझीना त्याला विश्रांती देण्याची सुचना केली होती. त्यानंतर इंग्लंड दौ-याकरिता त्याला अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटीतही खेळवले नव्हते. पण आता जे घडले ते चुकीचे आणि गोंधळात टाकणारे आहे.
Post a Comment