0
फेब्रुवारीपासून पोलीस व शासकीय यंत्रणांची मोहीम5मुंबई, ) :
        अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील धुम्र-पानाचे आणि तंबाखू व गुटखा खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याची गंभीर दखल घेताना विद्यार्थ्यांमधील व्यसनाचे प्रमाण रोखण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी जागतिक कर्करोगदिनापासून म्हणजे 6 फेब्रुवारीपासून पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि सर्व शासकीय यंत्रणांनी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले. या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांबरोबरच नागरिकांचाही सहभाग घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे नियमन.) अधिनियम, 2003’बाबत आढावा बैठक डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात आज झाली. त्यावेळीत्यांनी ही माहिती दिली. धुम्रपान,गुटखा, तंबाखूचे सेवन करणार्‍यांचीवाढती संख्या चिंतेची बाब आहे. शालेय जीवनापासूनच व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधनझाल्यास विद्यार्थ्यांमधील असणारेव्यसनांचे प्रमाण रोखणे सहज शक्य होईल.     
शाळा, महाविद्यालयांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस अधिनियमानुसार बंदी आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थांपासून आणि गुटखामुक्त करण्यासाठी जागतिक कर्करोगदिनानिमित्त 6 फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत पोलीस, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय करण्यात येणार असून स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
शहरी भागात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तींवर विहित रकमेचे चलन फाडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कार्यवाहीला पोलिसांनी गती द्यावी. बालकांना आणि बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करवून घेण्यावर प्रतिबंध आहे. अशा व्यक्तींवर बालहक्क कायद्यानुसार कारवाई केली जाते. बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विकणार्‍या दुकानांवर केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना द्यावी. शॉप अ‍ॅक्टनुसार असे लायसेन्स रद्द करण्याची कारवाई संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी दिले.
अंमलबजावणीसाठी समन्वय समिती
‘कोटपा’ अधिनियमाच्या अनुषंगाने दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येणार आहे. महिन्यामध्ये केलेल्या कारवाईची आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची माहिती बैठकीत घेण्यात येणार आहे. बेकायदेशीर आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या हुक्का पार्लरवर कठोर कारवाई करावी. प्रत्येक पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षकांना ‘कोटपा’नुसार कारवाईच्या सूचना द्याव्यात. जिल्हा पातळीवर या अधिनियमाची अंमलबजावणी व आढावा घेण्यासाठी विविध विभागांची समन्वय समिती स्थापन करावी. पोलीस महासंचालक स्तरावर दर महिन्याला घेण्यात येणार्‍या ‘क्राइम रिव्ह्यू’मध्ये ‘कोटपा’नुसार करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घ्यावा, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी दिले.
माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करायचा आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने शाळांशी आणि उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संपर्क साधून या मोहिमेत सहभागी होण्याबाबत कळवावे. मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी माध्यमांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

Post a Comment

 
Top