
महाबळेश्वर- महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून माेठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली हाेती. त्यामुळे ही गळती राेखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात अाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे दाेन ट्रक कापडाचा भराव टाकून ८० टक्के गळती थांबवण्यात यश अाले अाहे. दाेन महिन्यांपासून ही गळती सुरू हाेती.
या तलावातून महाबळेश्वर पाचगणी या दाेन्ही पर्यटनस्थळांना पाणीपुरवठा केला जाताे. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाणीगळती चिंतेचे कारण बनलले हाेते, मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. या गळतीमुळे धरण भिंतीस भगदाड पडून वेण्णा नदीच्या पात्रालगतच्या गावांनाही धाेका हाेण्याची भीती वर्तवली जात हाेती. अखेर रविवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तलावाच्या पायालगत माेठा खड्डा पडल्याचे दिसून अाले. त्यानंतर तातडीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इतरांच्या मदतीने कापूस, कापडाचा वापर करून हा खड्डा बुजवण्याच्या हालचाली सुरू केल्या. रविवारी रात्री अाठ वाजता सुरू झालेले हे काम सुमारे चार तास सुरू हाेते. खड्डा भरण्यासाठी कापडी वस्तू ,कापूस कमी पडू लागला तेव्हा प्रशासनाने राताेरात संपूर्ण महाबळेश्वर शहर पालथे घालून विविध हॉटेल्स, लॉजेस इतर ठिकाणाहून सुमारे दाेन ट्रक कापड अाणून हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. तसेच जेसीबीच्या साहाय्याने त्यावर मातीही टाकली. साेमवारी सकाळी पाहणी केली असता ८० टक्के गळती अाटाेक्यात आली. दरम्यान, लवकरच संपूर्ण गळती थांबवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
Post a Comment