0
फेरीवाल्यांच्या विरोधात असलेले राज ठाकरे आज ‘वर्षा’वर जाणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार) दुपारी 12 वाजता 'वर्षा' बंगल्यावर जाणार आहेत. या भेटीत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील, अशी माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे मनसेची काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या मोर्चावर मनसैनिकांनी भिरकावले बटाटे
काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्यात काल (बुधवार) सकाळी दादरमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणारा काँग्रेसचा मोर्चा बारगळला. दुसरीकडे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना हाय कोर्टाने मनाई केल्यामुळे याप्रकरणी मनसेचे बळ वाढले आहे.

दरम्यान, मागील दोन आठवडे मुंबईत फेरीवाल्यांवरून मनसे अाणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. बुधवारी दादरमध्ये मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ एका मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू झाला. इतक्यात मनसेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काँग्रेसच्या मोर्चावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. लागलीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी सुरू झाली. गोंधळाची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते नितीन पाटील यांची मोटार गाडी फोडली. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम मोर्चात सामील नव्हते.

Post a Comment

 
Top