0
मुंबई-अहमदाबाद रेल्वेत 40% प्रवासी घटले; पश्चिम रेल्वेस 29.91 कोटींचे आर्थिक नुकसान

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परंतु मुंबई ते अहमदाबाददरम्यान सध्या धावणाऱ्या रेल्वेतील जवळजवळ ४० टक्के जागा रिकाम्या राहत असल्याने ही बुलेट ट्रेन कशी यशस्वी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या तीन महिन्यांत पश्चिम रेल्वेला या मार्गावर प्रवासी नसल्याने २९.९१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-अहमदाबाददरम्यान सध्या दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल, भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती अशा मेल- एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या तीन महिन्यांत या गाड्यांमधून पश्चिम रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नाची आणि नवीन गाड्यांची माहिती मागवली होती.

पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनजीत सिंह यांनी १ जुलै २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतची माहिती दिली आहे. या तीन महिन्यात मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या ३० मेल एक्स्प्रेस गाड्यांमधून ७,३५,६३० प्रवाशांची क्षमता असताना ४,४१,७९५ प्रवाशांनी प्रवास केला. एकूण उत्पन्न ४४,२९,०८,२२० रुपये येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपये ३०,१६,२४,६२३ रुपयांचेच उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले. त्यामुळे १४,१२,८३,५९७ रुपयांचे नुकसान झाले. तर ३१ मेल एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता ७,०६,४४६ असताना ३,९८,००२ प्रवाशांनी प्रवास केला. ४२,४३,११,४७१ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना २६,७४,५६,९८२ रुपयांचेच उत्पन्न प्राप्त झाले. यामुळे सुमारे १५,७८,५४,४८९ रुपयांचे नुकसान झाले.
स्लीपर क्लासला मागणी, परंतु पूर्तता नाही 
अहमदाबाद मंडळ अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादसाठी नवीन गाडीचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. कार चेअरसाठी प्रसिद्ध असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अहमदाबाद येथे जाताना ७२,६९६ प्रवाशांची क्षमता असताना तीन महिन्यांत फक्त ३६,११७ प्रवासी लाभले. यामुळे ७,२०,८२,९४८ रुपयांऐवजी ४,११,२३,०८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर ८,२१६ एक्झिक्युटिव्ह चेअरपैकी फक्त ३,४६८ चेअर भरल्या. त्यामुळे १,६३,५७,८९८ रुपयांऐवजी ६४,१४,३४५ रुपयांचेच उत्पन्न मिळाले. मुंबई- अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या सर्वच गाड्यांची स्थिती अशीच अाहे. खरे तर स्लीपर क्लाससाठी सर्वाधिक मागणी असूनही रेल्वे मंत्रालयाने त्याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.

Post a Comment

 
Top