
श्रीनगर / बारामुल्ला- काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलाने रविवारी तीन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. या दहशतवाद्यांनी घुसखोरी करत गेल्या वर्षीप्रमाणेच लष्करी तळावर मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती. या चकमकीत लष्कराचा एक भारतीय जवान जखमी झाला असून सुरक्षा दलाची मोहीम सुरूच आहे.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात शिरण्याच्या तयारीत होते. यादरम्यान जवानांनी त्यांना आवाज दिला, तेव्हा त्यांनी गोळीबार सुरू केला. लष्कराने धडाकेबाज कारवाई करत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या आणि तीन दहशतवाद्यांना ठार केल्याच्या घटनेस लष्कराच्या उत्तर कमांडकडून दुजोरा देण्यात आला आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी म्हटले, हे दहशतवादी आत्मघाती हल्ले करण्यासाठीच घुसखोरी करत होते. गेल्या वर्षी अशाच हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले होते.
Post a Comment